Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रदूषणाचा विळखा

पर्यावरण मंत्री आणि राज्य सरकारने पर्यावरणप्रेमी असल्याच्या कितीही गप्पा मारल्या आणि आपली अवस्था दिल्लीसारखी होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांकडून शपथा घेतल्या तरीही मुंबईतील प्रदूषित हवा कोणाचेही ऐकण्याच्या आणि नियंत्रणात येण्याच्या परिस्थितीत नाही, हेच खरे. सालाबादप्रमाणे यंदाही राज्यातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत मुंबईने आपला नंबर कायम ठेवला आहे. भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावलेला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात समोर आले आहे.

मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते. वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते. जगभरात २०१७ साली झालेले १५ टक्के मृत्यू प्रदूषणामुळे झाले, असे ‘ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अँण्ड पोल्युशन’ (जीएएचपी) संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. सुमारे ४०० संस्था आणि ४० देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जीएएचपी संस्थेत आरोग्य आणि प्रदूषणासंदर्भात अभ्यास केला जातो. त्याच अभ्यासातून हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे. ग्रीनपीसच्या अभ्यासानुसार डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

जीएएचपी संस्थेच्या अहवालानुसार भारत आणि चीन हे देश अशा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये आघाडीवर आहेत असा धक्कादायक निष्कर्ष या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. जगात अचानक ८३ लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी २३ लाख मृत्यूंची भारतात नोंद झाली असून चीनमध्ये १८ लाख मृत्यूंची नोंद झाली. यापाठोपाठ २.७९ लाख मृत्यूंसह नायजेरिया असून इंडोनेशिया आणि पाकिस्तानमध्ये अनुक्रमे २.३२ लाख आणि २.२३ लाख मृत्यूंची नोंद झाली. अगदी अमेरिकेतदेखील या कारणामुळे २ लाख मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. यावरून जगभरात पसरलेल्या प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता प्रकर्षाने जाणवते. जीएएचपी संस्थेच्या अहवालानुसार जगात प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंपैकी तब्बल दोन तृतीयांश मृत्यू केवळ १० देशांमध्ये होतात. या यादीत बांगलादेश, रशिया, इथिओपिया आणि ब्राझील देशांचादेखील समावेश आहे. प्रदूषणामुळे होणा-या ३४ लाख (४० टक्के) अचानक आणि अकाली मृत्यूंचे कारण वाहने आणि उद्योगांमुळे निर्माण होणारे प्रदूषण आहे. या आकडेवारीचा स्वतंत्रपणे अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, चीनमधील अचानक झालेल्या मृत्यूंचे प्रमाण १२.४२ लाख असून भारतात हा आकडा १२.४० लाख आहे.

Exit mobile version