Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध – चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता पाहता दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी, मनरेगा अंतर्गत रोजगार व जनावर आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सर्वश्री शरद रणपिसे यांनी राज्यात दुष्काळग्रस्तांना मदत देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी श्री.पाटील म्हणाले, राज्यात151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या 151तालुक्यांसाठी 4909.51 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला होता. त्यापैकी 66.88 लाख इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये4461.20 कोटी रुपये इतका निधी वर्ग करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी जमीन महसूल सुट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपांच्या चालू वीज बिलात 33.5टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना केलेल्या आहेत. सन2019-20 वर्षाकरिता दुष्काळासाठी4473 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दुष्काळासाठी 4563 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जनावरांसाठी आवश्यक तिथे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात 1635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या वर्षी प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात 5506 गावांना 6905 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. चारा छावण्याबाबत काही तक्रारी आल्यास त्याची चौकशी केली जाईल. दुष्काळग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात सूट देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, जयंत पाटील, रामहरी रुपनवर आदींनी सहभाग घेतला.

Exit mobile version