Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन 2020-21चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असल्याचे सांगत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

श्री. मुंडे म्हणाले, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली असून ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केले आहे. परळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास भरघोस निधी देण्यात आला असून बीड जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.

शहरी दळणवळणाच्या सुविधांना प्राधान्य देणारा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा, ग्रामपंचायत बळकट करणारा, कोकणात मच्छिमार, फळबागायतदारांना नवीन संधी निर्माण करणारा, सेवा व उद्योग क्षेत्राला उभारी देणारा, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यासह इतर सुविधा देणारा, राज्याच्या अर्थकारणाला शिस्त लावत चालना देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 9 हजार 668 कोटी एवढी भरघोस आर्थिक तरतूद  अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ऊसतोड मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना असलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची घोषणाही अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे. तसेच याअंतर्गत ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे.

हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे नुकतेच वर्ग करण्यात आले आहे, त्यायोगे ऊसतोड मजुरांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षेसोबत आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात निधीचा वर्षाव

ऊसतोड कामगार महामंडळासह बीड जिल्ह्यासाठी हे अधिवेशन विशेष लाभदायक ठरले आहे. दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ यासह स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी देण्याचीही घोषणा, यासह विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी बीड जिल्ह्यावर निधीचा विशेष वर्षाव झाल्याचे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांसाठीच्या सर्व योजनांचा फायदाही जिल्ह्याला होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी सकारात्मक असून पहिल्या टप्प्यात हे काम सुरू करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Exit mobile version