Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात २७ हजार नेत्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले असून आतापर्यंत 74 नेत्रदान केंद्र स्थापित झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राज्य शासनाच्या समन्वयातून देशभर ‘राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येतो. वर्ष 2016-2017 ते 2019-20 आर्थिक वर्षानुसार देशातील 36 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत 2 लाख 64 हजार 695 नेत्रदान झाले आहेत.

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीबाधितता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात 27 हजार 889 नेत्रदान झाले आहे. राज्यात निर्धारित 7 हजार नेत्रदानाच्या तुलनेत जास्त म्हणजे वर्ष 2016-17 मध्ये 7 हजार 514 जणांनी नेत्रदान केले. वर्ष 2017-18 मध्ये 7 हजार 560 तर वर्ष 2018-19 मध्ये  7 हजार 323 दात्यांनी नेत्रदान केले. वर्ष 2019-20 या चालू आर्थिक वर्षात निर्धारीत 7 हजार 500 च्या तुलनेत आतापर्यंत 5 हजार 492 नेत्रदान झाले आहे. तसेच, गेल्या चार वर्षात देशात एकूण 380 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले असून महाराष्ट्रात 74 नेत्रदान केंद्र उभारण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य  आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

Exit mobile version