Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात

चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे या पिढीचे कर्तव्य असून वृक्षलागवडीच्या या मोहिमेत प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरोरा केले. स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कर्मभूमीतून, आनंदवनातून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या राज्यस्तरीय मोहिमेचा वृक्षारोपण करून त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

आनंदवन येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अटल आनंद घन-वन योजनेचा शुभारंभ वृक्षारोपणाने केला. शहरी भागात घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी जपानच्या धर्तीवर मियावाकी वृक्षलागवड पद्धतीचीदेखील आजपासून वन विभागाकडून सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी आनंदवनातील स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली. आनंदवनातील प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली. राज्यभर प्रचारासाठी निघालेल्या बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर वन विभागातर्फे आयोजित 33 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.

वृक्षप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 33 कोटी वृक्ष लागवड ही महत्वाकांक्षी संकल्पना आहे. पत्रकारांनी या ठिकाणी पोहोचल्यानंतरच विचारले की,आनंदवनातूनच ही 33 कोटी वृक्ष लागवडीची सुरुवात का केली जात आहे, तर ज्या नावातच वन आणि आनंद दोन्ही आहे. त्या आनंदवनाने स्वर्गीय बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनात मन दुभंगलेल्या वंचितांच्या जीवनात आनंद देण्याचे काम केले. त्यामुळे यापेक्षा चांगले स्थळ आणखी कोणते असू शकते? असे आमच्या मनात आले. त्यामुळेच या समाजोपयोगी मोहिमेची सुरुवात आनंदवनातून करण्याचा निर्णय घेतला.

ते म्हणाले, चार वर्षांपूर्वी वनविभागामार्फत 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जेव्हा करण्यात आला. तेव्हा ही पुन्हा एक राजकीय घोषणा असावी असे सर्वांना वाटले. मात्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा उपक्रम लावून धरला. लवकरच 50कोटी वृक्ष लागलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. सध्या वाढत्या तापमानमुळे पर्यावरण समतोल बिघडतोय. हे समजून घेतले पाहिजे. त्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे निसर्ग संतुलन बिघडले आहे. त्यासाठी पर्यावरण ऱ्हास टाळलाच पाहिजे. पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजेत. यातून दुष्काळावर मात करता येईल. आता जागे होण्याची वेळ आहे. धरती वाचविण्यासाठी प्रदूषण पातळी खाली आणली पाहिजे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी आता झाडे लावूया, असे आवाहन त्यांनी केले.

10 वर्षापूर्वी पर्यावरणाच्या ऱ्हासाची गंभीरता जाणवत नव्हती. मात्र आता त्याचे दृष्य पारिणाम दिसताहेत. निसर्गाचे संतुलन ज्या घटकाने बिघडवले त्या घटकाचा बदला पर्यावरण स्वतःहून घेते. त्यामुळे पर्यावरणाला जपणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा पर्यावरण आपला बदला घेईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्व देशांना कार्बनचे प्रमाण 20 टक्के कमी करण्यासाठी भारत प्रयत्न करेल,असे अभिवचन दिले आहे. मोदीजींच्या या घोषणेला जागतिक स्तरावरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता वृक्ष लागवडीच्या या मोहिमेमध्ये सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवीन अँँप तयार करावे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातला प्रत्येक नागरिक किती कार्बनचा विसर्ग करतो व पर्यावरण संवर्धनासाठी काय काम करतो याची नोंद घेतली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी भाषणाच्या शेवटी केली.

Exit mobile version