Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात पोलीसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झालेल्या दोघा पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखाची मदत आणि नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये पोलीस अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत असून सरकार ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र  कोरोना दक्षता कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून यात नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलिस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारच्या कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

धीरज व कपिल वाधवान या दोघांना काल सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर त्यांच्या कुटुंबातल्या इतर लोकांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्र दिलं होतं. मानवतेच्या आधारावर हे पत्र देण्यात आल्याचे गुप्ता यांनी चौकशी समितीला सांगितल्याचं देशमुख म्हणाले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे तसेच या चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version