Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून  एप्रिल २०२० मध्ये राज्यातील १ कोटी ५६ लाख २ हजार ४३४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख ५६ हजार १६५ क्विंटल गहू, १५ लाख ८७ हजार ६६३ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ७४३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ८ लाख ४५ हजार ४४२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी ३६ लाख ९५ हजार ५२४ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ६ कोटी २१ लाख १२ हजार ८६३ लोकसंख्येला ३१ लाख ०५ हजार ६४० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ APL केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आजपर्यंत १ लाख ६७ हजार २५० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

Exit mobile version