Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

फक्त ५ रूपयांत फिरत्या गाडीद्वारे गरजूंना मिळतेय जेवण

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठाण मधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करिता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० पार्सल दररोज गरजूंना गाडीतून शहरात पोहचविले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगरपरिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगरपरिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली द्वारा संचलित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचलित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे.

शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेवून आलेले शेतकरी, दवाखान्यातील रुग्णांचे नातेवाईक इत्यादींना अल्पदरात जेवणाची सोय यातून होणार आहे. ज्यांच्याकडे ५ रूपये सूद्धा नाहीत त्यांनाही मोफत यामधून जेवणाची पार्सल दिले जात आहे. सकाळी अन्नपूर्णा आपल्या दारी मधून नास्ता, दुपारी शिवभोजन केंद्रावर जेवण व पुन्हा सायंकाळी अन्नपूर्णा आपल्या दारी मधून जेवण अशा पध्दतीने दररोज तीन वेळ अन्न पुरविण्याचे काम गडाचिरोली प्रशासनाकडून केले जात आहे.

गरजूंनी या वेळेला या ठिकाणी सकस आहाराचा लाभ घ्यावा –

सकाळचा नास्ता : रूपये ५ मध्ये : वेळ स.८ ते स.९:३० ठिकाण – जिल्हा क्रीडांगण – शेतकरी बाजार, हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकूळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी

दुपारचे जेवण : रूपये ५ मध्ये : वेळ स. ११.०० ते दु. ३.०० ठिकाण – कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड, शिवभोजन केंद्र, गडचिरोली.

सायंकाळचे जेवण : रूपये ५ मध्ये : वेळ सायं.६.३० ते सायं. ७:३० ठिकाण – हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकूळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी

यानुसार शहरात एकुण ७५० थाळी नास्ता व जेवण दररोज गरजूंना पुरविण्यात येत आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामधून या योजनेची अंमलबजावणी नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. शहरातील विविध वार्डात वस्तीस्तरीय संघ यांनी गरजू व गरीब कुटुंबांची यादी तयार केली आहे. माविमचे क्षेत्रिय समन्वयक, सहयोगिनी व नगर परिषदचे शहर अभियान व्यवस्थापक लाभार्थ्यांची पडताळणी करीत आहेत.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचा पुढाकार : गडचिरोली जिल्ह्यात असलेला मोठा मजूर वर्ग व संचारबंदीमुळे आलेली परिस्थिती यातून कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी या योजनेला प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली. जिल्हा खनिज प्रतिष्ठाणमधून वीस लक्ष मंजूर करण्यात आली. यातील पहिला हप्ता रूपये ५ लक्ष गरपरिषदेला वर्ग करण्यात आले आहेत. दि. २५ एप्रिलपासून ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. आता दि. २५ एप्रिल ते ५ जून पर्यंत दररोज सकाळी २५० नास्ता व सायंकाळी २५० जेवण या पद्धतीने अन्नपूर्णा आपल्या दारी “मील ऑन व्हील” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेमार्फत माविम कार्यालयात झाला शुभारंभ : प्रायोगिक तत्वावर यशस्वी झालेल्या या उपक्रमाचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळ येथे नगराध्यक्षा योगिता पिपरे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संजय ओव्हळ, माविमच्या व्यवस्थापक कांता मिश्रा, नगरसेवक प्रमोद पिपरे व माविमच्या बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.

सकस व रूचकर जेवण : दोन चपात्या, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी व १ वाटी वरण हे एका पार्सल जेवणात समाविष्ट करण्यात आले आहे. हे जेवण तयार करताना आवश्यक स्वच्छता व काळजी घेतली जात आहे. पॅकिंग करताना आवश्यक स्वच्छता ठेवूनच केली जाते तसेच सदर पॅकिंग बंदिस्त स्वरूपात गरजूंपर्यंत पोहचविले जाते.

जिल्हाधिकारी, दीपक सिंगला : केंद्र व राज्य शासनाच्या सूचना मिळाल्यानंतर सदर निधी जिल्ह्यातील गरजूंसाठी वापर करण्याकरिता फिरत्या गाडीतून ‘मील ऑन व्हील’ योजना तयार करण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू केल्यानंतर ती यशस्वी झाली. शहरातील गरजू लोकांनी या सकस भोजनाचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करीत आहे. यासाठी नाममात्र शुल्क ५ रूपये ठेवण्यात आले आहे. फारच गरीब व पैसे नसलेल्या गरजूंना आपण मोफत भोजन वितरित करत आहोत. ही योजना पुढिल ४० दिवस सुरू ठेवण्यात येणार असून गरजेनुसार त्यातील २५० जेवणांच्या थाळीच्या संख्येत वाढही करण्यात येणार आहे.

Exit mobile version