Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ! गर्दी टाळा-शिस्त पाळा – मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई : कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की,  लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने  आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या  सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही.  संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता  पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका,  सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जनतेवर विश्वास

सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील,  त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

Exit mobile version