Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई-ठाण्यात जून महिन्यात २ लाख ५० हजार ६९९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप

५ लाख ३८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे

मुंबई : मुंबई शहर उपनगर आणि -ठाणे मध्ये  1 जून ते  23 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 2 लाख 50 हजार 699 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जून  ते 23 जून 2020 पर्यंत 14 लाख 73 हजार 45 शिधापत्रिका धारकांना 5 लाख 380 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली यांनी दिली आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 87 लक्ष आहे.  या लाभार्थ्यांना 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. मुंबई ठाणे मध्ये  या योजनेमधून सुमारे 1 लाख 63 हजार 270 क्विंटल गहू, 1 लाख 10 हजार 320 क्विंटल तांदूळ, तर 103 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे 98 हजार 519 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जून ते 23 जून एकूण 9 लाख 89 हजार 194 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवर सुमारे 40 लाख लोकसंख्येला 1 लाख 92 हजार 810 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 13 लाख 66 हजार 652 एपीएल केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे  दि. 1 जून ते 23 जून 2020 पर्यंत 26 हजार 230 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची  तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 13 हजार 490 क्विंटल  डाळीचे वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत 7 हजार 750 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटूंबाला 1 किलो अख्खा चन्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे.

Exit mobile version