आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत – छगन भुजबळ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते आज नाशिकमध्ये कोरोना संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सध्या सुरू असलेल्या वाकयुध्दावर त्यांनी टीका केली. सर्वांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे, सर्व घटकांचा विचार करून भूमिका घेतली पाहिजे असं ते म्हणाले. एक निर्णय घेताना दुसऱ्या समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करावा, तसंच राज्यातलं वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
यंदा चांगला पाऊस झाल्यानं मुबलक पाणी आहे. जायकवाडीतही पाणी शिल्लक असल्यानं नाशिकच्या धरणांमधून पाणी द्यावं लागणार नाही, मात्र आकस्मिक गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं, अशा सूचना भुजबळ यांनी आढावा बैठकीत दिल्या. नाशिक शहरात परिमीट रूम सकाळी ११ ते रात्री दहा आणि हॉटेल्स रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहू शकतील, असं भुजबळ यांनी सांगितलं. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यााठी दुकानदारांनी दक्ष राहावं आणि मास्क न वापरणाऱ्या नागरीकांना माल देऊ नये असेही भुजबळ म्हणाले.