Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून आणि लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टी आणि पूरस्थितीत सतर्क राहून आणि लोकांना विश्वासात घेऊन काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी काल पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसंच या विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात  काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत राहा. जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांना  विश्वासात घेऊन स्थलांतराचं काम करा, असं त्यांनी सांगितलं.

पुरग्रस्त नागरिकांचं स्थलांतर करतांना कोरोनासंदर्भातल्या उपाययोजनांची काळजी घ्यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही  काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार करायच्या स्थलांतराचंही वेळीच नियोजन करावं, स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घ्यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना तिथं आवश्यक असणारी मदत पुरवावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगानं हाती घ्याव्यात, असंही ते म्हणाले. पूर आणि अतिवृष्टीनं पिकं आणि मालमत्तेचे जे नुकसान झालं त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीनं करावेत. यात मरण पावलेल्या नागरिकींच्या कुटुंबिंयाना  तातडीनं आर्थिक मदत द्यावी,  अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पूरग्रस्त भागातल्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मोदी यांनी ट्वीटर संदेशात दिली आहे.

Exit mobile version