Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात

मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एका महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवन येथे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, स्वातंत्र्य सैनिक कक्षाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उपसचिव राहुल कुलकर्णी, करपते, वित्त विभागाचे उपसचिव सु.मो. महाडिक, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेचे भाऊसाहेब साळुंखे, आप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा, स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा सन्मान झालाच पाहिजे. या दृष्टीने त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे समांतर आरक्षण तसेच, ज्याप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती केली जाते त्याप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास कुटुंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय नोकरीचा लाभ देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करणे, घरकुल योजनेत विशेष बाब म्हणून सामावून घेणे आणि स्वातंत्र्य सैनिकासह त्यांच्या वारसदारास ओळखपत्र देण्यासंदर्भात  सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Exit mobile version