Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य शासनाच्या मदतीचे शेतकऱ्यांकडून स्वागत; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मानले आभार

सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील विविध तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा, घरे, पशुधन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दौरे करुन परिस्थितीची माहिती घेतली होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यानुसार काल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने सुमारे दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याविषयी  शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या अर्थसहाय्याचे स्वागत केले. शेतकऱ्यांनी मदतीबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे –

शासनाच्या घोषणेवर समाधानी

राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे पीक, शेती आणि घराची पडझड झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत २० हजाराची मदत जाहीर केली. या घोषणेचे मी स्वागत करतो, पण पूर्णपणे समाधानी नाही. यात आणखी वाढ करायला हवी होती. माझ्या चार गायी, दोन वासरे पाण्यात वाहून गेली तर शेती आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकात अजून पाणी आहे. अंदाजे माझे पाच लाखांच्या वर नुकसान झाले आहे, मात्र शासनाने मदत जाहीर करून दिलासा दिला, ही चांगली गोष्ट आहे.

– शिवलिंग नाईक, रेल्वे स्टेशन, मोहोळ.

शासन जे देतयं त्यात समाधानी

राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत २० हजाराची मदत जाहीर केली. याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या घोषणेचे मी स्वागत करतो. कारण कोरोनामुळे सर्वजण डबघाईला आलेले आहे, त्यात आता अतिवृष्टी… शासन जे देतयं त्यात समाधानच मानावे लागेल. माझा अडीच एकर कांदा पूर्णपणे वाया गेला तर ऊस, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन जर्सी गायी, एक म्हैस पाण्यात वाहून गेली, हे भरून न निघणारे नुकसान आहे. पण शासनाने मदत केल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे.

– उमेश मोटे, नरखेड, ता. मोहोळ

मदतीमुळे शेती पुन्हा सुरु करता येईल

अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे नदी काठच्या शेत पिकांचे व इतर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत १० हजाराची मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे शेतीत थोड्याफार प्रमाणात प्रगती करता येईल. माझ्या कुटुंबाच्या नावावर भंटुबरे ता.पंढरपूर याठिकाणी  सव्वाचार एकर शेती आहे. या क्षेत्रावरील पीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या मदतीमुळे थोडाफार हातभार लागल्याने शेतीत सुधारणा करता येईल.

श्री. श्रीधर मार्तंड कारंडे, मु.पो.भंटुबरे, ता.पंढरपूर, जि.सोलापूर

 

मदतीमुळे पुन्हा शेती फुलविणार

माझी १४ एकर शेती चंद्रभागा नदी काठी असल्यामुळे, संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेले. तसेच काही पिके वाहून गेली. माझ्या शेतातील हरभरा, कांदा, ऊस, भुईमुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तत्काळ मदत जाहीर केल्याने शेती पुन्हा फुलविणार आहे. या मदती बद्दल मुख्यमंत्री तसेच राज्य शासनाचे आभार मानतो.

श्री. ब्रिजेश शर्मा, मुपो. शेगांव दुमाला, ता.पंढरपूर, जि.सोलापूर

Exit mobile version