Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतनिहाय सुरू : जिल्हाधिकारी राम

????????????????????????????????????

23 ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतक-यांची शिबिरे

60 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार

पुणे : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ गावपातळीवरील सर्वांपर्यंत पोहोचावा, पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करावी यासाठी दिनांक 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2019 या कालावधीत ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

केंद्र शासनामार्फत देशातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी भु-अभिलेखानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे शेतकरी पात्र आहेत.

ही योजना ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या 1 ऑगस्ट, 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रुपये 55  ते दोनशे रुपये याप्रमाणे वयाच्या 60 वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्यांच्या मासिक हप्त्या इतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये 30/- सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

Exit mobile version