Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचे पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आवाहन

3 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी387 कोटीचे कांदा अनुदान

मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी अनुदान जाहीर केले होते. दुसऱ्या टप्प्यात दि.16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी2019 पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून आपले बॅंक खाते क्रमांक आणि आवश्यक ती माहिती तात्काळ  द्यावी असे, आवाहन पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.

श्री. शिंदे म्हणाले, अनुदानाची रक्कम ही आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून दिली जात असून जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. अनुदानासाठी काही अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी थेट या टीमशी संवाद साधावा.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दि. 1 नोव्हेंबर 2018 ते दि.15 डिसेंबर2018 या कालावधीत विक्री केलेल्या 1 लाख 60 हजार 698 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 114.80 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात दि. 16 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीतील विक्री केलेल्या 3 लाख 93 हजार 317 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 387.30 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून अनुदान वितरण प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे ग्रामीण, सोलापूर, कोल्हापूर,सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रा.शिंदे यांनी दिली.

Exit mobile version