Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून सुटकेची शंभर वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानातील काळ्या पाण्याचा दहा वर्षांचा खडतर तुरुंगवास भोगल्यानंतर २ मे १९२१ रोजी त्यांची सशर्त सुटका झाली. या घटनेला आज १०० वर्ष पूर्ण होताहेत.

अंदमानातून सुटले तरी सावरकरांना त्यांचे बंधू गणेश विनायक ऊर्फ बाबाराव सावरकर यांच्यासोबत रत्नागिरीत कैदेतच ठेवण्यात आलं. १९२४ मध्ये त्यांची मुक्तता झाली परंतु रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाण्यास मज्जाव आणि राजकीय उपक्रमांमध्ये सहभाग न घेण्याची सक्ती त्यांच्यावर लादण्यात आली.

१९३७ मध्ये हे निर्बंध उठवण्यात आले.  यानंतरची त्यांची खरी सुटका त्यांच्या मनातील लोकोत्तर कार्यांसाठी लक्षणीय ठरली. अंदमानातील तुरुंगवासात पडून राहण्यापेक्षा किंवा तिथं शक्य ते तुरुंग सुधारणा उपाय करवून घेतल्यानंतर बाहेर येऊन देशासाठी आवश्यक कार्य आपण अधिक चांगल्या प्रकारे करु शकतो आणि ते अधिक गरजेचं आहे असा ठाम विश्वास सावरकर यांना वाटत होता.

परंतु तसं करत असताना आपल्या कृतीला आणि त्यानंतर मिळणाऱ्या स्वातंत्र्याला वेगळाच अर्थ चिटकू नये याबाबतही ते सजग होते. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या समान गनिमी कावा वापरुन त्यांनी याचिका पत्रे लिहिली.

१९१४ मध्ये पहिल्या विश्व युद्धात ब्रिटीश सरकारनं हिंदुस्तानला स्वयं-शासन मंजूर केलं आणि केंद्रीय विधीमंडळात बहुमत दिलं तर क्रांतिकारी, या युद्धात ब्रिटनला मदत करतील अशी याचिका त्यांनी पाठवली.

मला एकट्याला अंदमानात ठेवा, बाकी सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करा अशी तयारी देखील त्यांनी दाखवली. आपण केवळ स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही हेच त्यांनी यातून दाखवून दिलं. सरकारनं आपल्या सक्रीय राजकारणावरही बंदी घालावी, आपण केवळ समाजकार्य करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

माय ट्रान्सपोर्टेशन फॉर लाईफ या पुस्तकात सावरकरांनी या सर्व पत्रांचा सविस्तर उल्लेख केला आहे.

सुटकनेंतर सावरकरांनी केलेल्या समाज सुधारणांमध्ये भाषा शुद्धिकरणाची चळवळ, धर्मांतर झालेल्यांचं पुन्हा हिंदु धर्मात घेण्याची शुद्धिकरण प्रक्रिया, पतितांना मंदीर प्रवेश, अशी लोकोत्तर कार्यं केली आणि सुटकेसाठी केलेली याचिका पोकळ नव्हती हे सिद्ध केलं.

Exit mobile version