Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याकरता सर्वांनी सहकार्य करण्याचे प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजनांना गती देण्याकरता सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यां बरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यामातून बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांचे मुख्यमंत्री, या बैठकीत सहभागी झाले होते. या राज्यांमध्ये उपाचाराधीन रुगणांची  संख्या जास्त असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशातल्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण या राज्यांमधून आढळतात. राज्यांनी मायक्रो कन्टेन्मेंट झोन्सवर भर दिला पाहिजे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ज्या राज्यांमध्ये सर्वप्रथम आली त्या

ठिकाणी ती आटोक्यातही लवकर येईल, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला होता, मात्र महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ, चिंतेची बाब असल्याचं, प्रधानमंत्री म्हणाले.

चाचणी, योग्य उपचार आणि बाधितांच्या संपर्कातल्या लोकांचा शोध, यावर भर देणं, तसंच अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिक काळ सतत बाधितांच्या संख्येत वाढ होत राहीली, तर या विषाणूच्या नव्या प्रकारांचा धोका वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठं आव्हान आहे.

या दृष्टीनं, विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबवण्यासाठी केंद्र सरकारनंच त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं उचललेल्या उपाय योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिली.

Exit mobile version