Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भाजपने जनतेची जाहीर माफी मागावी

अनधिकृत बांधकामे, बैलगाडा शर्यत, साडेबारा टक्के फरताव्याबाबत खोट्या जाहिराती    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आक्रमक

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच पातळ्यांवर आश्वासनांच्या गाजराची शेती करून लोकांची फसवणूक करत आहे. अनधिकृत बाधकामे, बैलगाडा शर्यत आणि साडेबारा टक्के परताव्याबाबत जाहिरातबाजी करून आमदार महोदयांनी पूर्ण न झालेली कामेही आपण केली असल्याचा गाजावाजा चालविला आहे. ही खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून मोठी फसवणूक आहे. आमदारांच्या या वर्तणूकीमुळे भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमधील जनतेची जाहीर माफी मागावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री द्रवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या फोटोसह अनेक फलक झळकत आहेत. “आमचे आश्वासने, आमचा पाठपुरावा” या  शिर्षकाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामाची जाहिरात करण्यात आलेली आहे. शहरभर लागलेल्या या जाहिरातींबाबत अनेक प्रश्न निर्माण होवू लागले आहे. या जाहिरातींव्दारे त्यांचा खोटा प्रचार सुरू असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांना फसविण्याचा हा सगळा प्रयत्न या जाहिरतातींमधून सुरू आहे.
फसवणुकीचा पहिला प्रकार अनधिकृत बांधकामासंदर्भात आहे. या आमदारांनी बिनधास्त 1 हजार चौरस फुटांपर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित केल्याच्या जाहिराती लावल्या. प्रत्यक्षात या प्रकारे कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जो अध्यादेश काढला. त्यानुसार अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी किती अर्ज आले आणि किती जणांची घरे अधिकृत झाली ? हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरा खोटारडेपणा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील बाधीत शेतक-यांच्या बाबतीत या आमदारंनी केला आहे. प्राधिकरणाने संपादित क्षेत्राचा शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिल्याचा प्रचार ते करत आहेत. प्रत्यक्षात साडेबारा टक्के परतावा देण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य शासनाकडून कोणताही कायदेशीर निर्णय अद्याप पूर्ण झालेला नाही.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील आणि पुणे जिल्ह्यातील नागिरकांसाठी बैलगाडा शर्यत हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बैलगाडा शर्यतीबाबत सरकारने पावले उचलली असली, तरी आणखी या प्रकरणाचा न्यायालयीन तिढा सुटलेला नाही. तसेच, अद्याप कुठेही बैलगाडा शर्यत सुरू झालेली नाही. तरी देखील या प्रश्नाचे भांडवल करून आमदार लोकांची दिशाभूल करत आहेत. या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा गवगवा केला जात असताना दुसरीकडे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक गैरव्यवहार झाले असून मोठ मोठे प्रकल्प रखडलेले देखील आहे. तरी देखील भाजपने केलेली ही जाहिरातबाजी म्हणजे सर्वसामान्य जनांची ही फसवणूक आहे.
त्यामुळे या आमदारांनी आणि भाजपच्या नेत्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा शहरात मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दत्ता साने यांनी दिला आहे.
Exit mobile version