Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा डिजीटल मध्यमांद्वारे आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेअंतर्गत भारताचा स्वातंत्र्यलढा तसंच स्वदेशी चळवळ आणि भारताच्या राज्यव्यवस्थेतलं खादीचं महत्व यासंदर्भातले प्रश्न विचारले जाणार आहेत. उद्या ३१ ऑगस्टपासून ते येत्या १४ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या १५ दिवसांमध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सर्व डिजीटल व्यासपीठांवरून दररोज ५ प्रश्न विचारले जातील. प्रश्न विचारल्यानंतर स्पर्धकांना १०० सेकंदांमध्ये आपलं उत्तर द्यायचं आहे. स्पर्धा सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत खुली असेल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना www.kviconline.gov.in/kvicquiz/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्तरे देणारे एकूण २१ स्पर्धक विजेते म्हणून निवडले जातील. यात पहिल्या क्रमांसाठी १ तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी १० विजेते असतील. पारितोषिकं म्हणून दररोज ८० हजार रुपयांची खादी इंडिया इ कुपन दिली जाणार आहेत. याचा वापर करून खादी इंडियाच्या पोर्टलवरून खादीची उत्पादनं खरेदी करता येणार आहेत.

Exit mobile version