Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.  नव्या पिढीतून आपल्याला रोबो घडवायचे नसून माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा आपला विश्वास असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार म्हणाले. साहित्य रसिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असं सांगून  मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर,  स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ,साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. संमेलनाच्या समारोप सत्रात एकूण 13 ठरावांचं  वाचन करण्यात आलं आणि त्याला एकमतानेनं मंजुरी देण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनानेनं केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून तो केंद्र शासनानं त्वरित मंजूर करावा अशी मागणी करणारा ठराव संमेलनात झाला. कर्नाटक सरकार मराठी भाषकांची गळचेपी करीत असल्यानं कर्नाटक सरकारच्या निषेधाचा ठराव या वेळी करण्यात आला. गोव्यामधल्या  मराठी परिचय केंद्राचं पुनरुज्जीवन करावं तसंच ज्या राज्यांमध्ये मराठी परिचय केंद्र नाही तिथंते सुरू करून त्या ठिकाणी मराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असाही ठराव संमेलनात करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची होणारी अवस्था लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारनं आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी असाही ठराव संमेलनात करण्यात आला. बोली भाषेच्या संवर्धनासाठी तज्ञांची कृती समिती तयार करावी तसंच मराठी शाळा सुरू राहाव्यात  यासाठी राज्य सरकारनं  कृती आराखडा तयार करावा या ठरावाचा यात समावेश आहे.

Exit mobile version