Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या येऊर हुमायुन बंधाऱ्याची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलद गतीने दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

मंत्रालयात मिरा-भाईंदर येथील बंधारा बांधकाम तसेच येऊर येथील बंधारा दुरूस्तीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, येऊर येथील हुमायून बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रस्ताव करून तो वन विभागास सादर करावा. जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. ओवळा-माजीवाडा येथील ठाणे महानगरपालिका हद्दीतील येऊर हुमायून बंधाऱ्याचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुरूस्तीचे काम केल्यास त्याचा वन्य प्राण्यांनाही फायदा होईल. तसेच विशेष बाब म्हणून ८०० मीटरची संरक्षित भिंत बांधण्यात यावी.

याचबरोबर मिरा-भाईंदर नदीजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधुन येणारे पाणी साठवून महानगर पालिकेच्या हद्दीत उपलब्ध करुन दिल्यास तेथिल नागरिकांना त्याचा फायदा होईल. तसेच, अतिरिक्त पावसाच्या पाण्यामुळे चेना नदीचे पाणी खाडीत जाते त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही, मात्र, शेतीचेही नुकसान होते. या समस्या विचारात घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात यावे, असे निर्देशही श्री.गडाख यांनी दिले.

उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा शोध घेत नागरीक वस्तीत यावे लागते, यामुळे अनेक दुर्घटना घडतात. या दुर्घटनांना आळा बसावा यासाठी वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बंधा-याची दुरूस्ती करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यानुसार श्री. गडाख यांनी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

बैठकीस जलसंधारण विभागाचे अवर सचिव श्री पाटील, सहसचिव श्री दि.गा. प्रक्षाळे आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version