Site icon साप्ताहिक एकच ध्येय

युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात असून बाहेर पडण्याची निश्चित तारीख आणि वेळ लौकरच कळवू तोपर्यंत दूतावासाने जारी केलेले गुगल अर्ज भरुन द्यावे असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीयांना सुखरुप परत आणण्यात दूतावास कोणतीही कसर ठेवणार नाही असं भारतीय राजदूत पार्थ सत्पती यांनी सांगितलं आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत बाराशेहून जास्त भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणणारी 7 विमानं आज बुडापेस्ट, सुशेवा आणि बुखारेस्ट विमानतळांवरुन आकाशात झेपावतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली. काल 11 विमानांमधून दोनहजारपेक्षा जास्त भारतीय मायदेशी परतले. 22 फेब्रुवारीला ऑपरेशन गंगा सुरु झाल्यापासून 15 हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक युक्रेनमधून सुरक्षितपणे भारतात परत आले आहेत.

ऑपरेशन गंगाच्या सफलतेचं श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या वाढत्या प्रभावाला दिलं आहे. पुण्यात काल सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवात केलेल्या भाषणात ते म्हणाले की युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिकांना सुखरुप बाहेर काढताना भल्या भल्या देशांना अडचणी येत आहेत.

Exit mobile version