Site icon साप्ताहिक एकच ध्येय

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : इराकच्या कुर्दिस्तान भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ.हवल अबूबकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने विशिष्ट अतिथींच्या भारतभेटीच्या कार्यक्रमांतर्गत डॉ. हवल अबूबकर यांच्या भारत भेटीचे आयोजन केले आहे.

इराकी आणि विशेषतः कुर्दिश भाषिक सुलेमानी लोक भारतीय संस्कृती व लोकांशी विशेषत्वाने जोडले आहेत. भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ व्हावे यादृष्टीने आपण प्रयत्न करू, असे गव्हर्नर डॉ.अबूबकर यांनी राज्यपालांना सांगितले.

भारत व कुर्दिश सुलेमानी प्रांतांमधील संबंध दृढ व्हावे या दृष्टीने एक कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केली.

इराक भारताकडून तांदूळ, कापड, इलेक्ट्रॉनिक उत्पादने आयात करत असून उभय देशांमधील व्यापारी संबंध वाढावे या दृष्टीने आपण येथील व्यावसायिक व चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा केल्याचे डॉ.अबूबकर यांनी सांगितले.

इराक मध्ये साधारणत: एक लाख भारतीय आहेत. त्यापैकी 35 हजार सुलेमानी प्रांतात राहत असून दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार, वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत.

सुलेमानी प्रांतातील पर्वतरांगांवर भारतीय देवी-देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. जुन्या सुलेमानी लोकांना भारतीय भाषा देखील अवगत होत्या. कुर्दिश भाषेच्या व्याकरणावर पाणिनी यांचा प्रभाव असल्याचे डॉ.अबूबकर यांनी सांगितले.

जगभर ५० लाख कुर्दिश भाषिक लोक राहत असून यापैकी बहुतांश इराकी कुर्दिस्तान येथे राहतात तसेच इराण, तुर्की, व सिरिया येथे देखील राहत आहेत. हे सर्व कुर्दिश भाषिक लोक भाषा व संस्कृतीच्या समानतेच्या धाग्याने बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला इराकचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ.गाझी अल-तोपी तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालक रेणू प्रिथियानी उपस्थित होते.

Exit mobile version