Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन

मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन आणि लेखन करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आज राजभवन येथे डॉ. कलाम यांना अभिवादन  करण्यात आले आणि त्यानंतर राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी काही कविता, गोष्टी, उतारे उपस्थितांना वाचून दाखवत अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या कार्यक्रमास राजभवन येथील अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते, त्यांच्या कार्याला मनन आणि चिंतनाची भक्कम बैठक होती. आजच्या तरुणांनी वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांनी वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करुया, असेही आवाहन राज्यपाल यांनी यावेळी केले.

Exit mobile version