Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जलदूत – जलसंवर्धन रथाचा शुभारंभ

निसर्गाचे पावित्र्य राखण्याकरिता जलसंवर्धन आवश्यक – कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर
क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने जलशक्ती अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती

अमरावती : भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या सहकार्याने जलशक्ती अभियानावर आधारित चित्ररथाचे उद्‌घाटन विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनाच्या प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते रथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, रासेयो चे संचालक डॉ राजेश बुरंगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री इंद्रवदनसिंह झाला आणि जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदूरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले की, जलशक्ती चळवळीमध्ये सहभागी न होता आचरणामधून ही समस्या सोडवायची आहे. निसर्गाचे सौंदर्य टिकवण्यासाठी पाणी बचत महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी समजून पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच भारत सरकारच्या जलशक्ती अभियान चळवळीत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा क्षेत्र, चांदूर बाजार आणि अचलपूर या भागात जलदूत (फिरते वाहन) फिरवण्यात येणार आहे. जलदूतची निर्मिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने पुणे येथील केंद्र सरकारच्या रिजनल आउटरिच ब्यूरोद्वारे करण्यात आली आहे. या चित्ररथात जलसंरक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपारिक जलस्त्रोताचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम, घनदाट जंगल निर्मिती आणि देशातील सध्याची जलस्थिती या विषयांवर चित्र, संदेश फलक, ऑडिओ-व्हिडिओ इत्यादी माध्यमांद्वारे माहिती देण्यात आली आहे.

उद्‌घाटनानंतर चित्ररथ विद्याभारती महाविद्यालय, श्री गणेशदास राठी स्कूल, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विभागीय शासकीय ग्रंथालय, प्रा. राम मेघे इंजिनिअरिंग अँड व्यवस्थापन महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय आणि बस डेपो इत्यादी मार्गावर फिरणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, श्रीकांत जामभूळकर, सचिन भाटे, लक्ष्मण राठोड, राजू चव्हाण, नारायण तडस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version