नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शनिवारपर्यंत अंदमान निकोबार द्वीपसमूहात पोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भागात तसंच लगतच्या अंदमानजवळच्या समुद्रात आज कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे. त्यात येत्या दोन दिवसांत यात वाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बंगालच्या उपसागरात शनिवारी संध्याकाळी वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सुनचा पाऊस १ जूनपासून सुरू होईल. महाराष्ट्रात नेहमीपेक्षा ३ ते ७ दिवस उशिरानं पावसाची सुरुवात होईल तर मुंबईत ११ जूनपासून पावसाची सुरुवात होईल. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याचाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

दरम्यान राज्यात काल मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं ४३ पुर्णांक ६ दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.