मुंबई : राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीला ही मागणी केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अंतिम सत्रातील ८ ते १० लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे व्यवहार्य नाही. परीक्षा न घेता ग्रेडिंग सिस्टमसाठी युजीसीकडे परवानगी मागण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत युजीसीकडून काही निर्णय न आल्यास राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, मुख्य सचिव यांच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहूनच अंतिम सत्रातील परीक्षाबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.