मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था

मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी  (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची व्यवस्था राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. याद्वारे २३०० मच्छिमार व खलाशांना श्रमिक रेल्वेद्वारे त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विविध मच्छीमार सोसायट्यांशी संपर्क साधून  पोलिस आयुक्त झोन ११ यांच्या सहकार्याने नियोजन केले.  महाराष्ट्र राज्याच्या सागरी क्षेत्रात मढ, भाटी, मुंबई उपनगर, मुंबई शहर सह सात सागरी जिल्ह्यांमध्ये मासेमारी व्यतिरिक्त नौका दुरुस्ती , नौका बांधणी, जाळी विणणे व बांधणी, बर्फ कारखाने, मासळी प्रक्रिया उद्योग, मासळी व्यापार या वेगवेगळ्या कामांतून शाश्वत रोजगार उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातोल मच्छीमार महाराष्ट्रात येतात. १ऑगस्ट ते ३१ मे हा मासेमारी हंगम असल्याने व १ जुन ते ३१ जुलै सागरी मासेमारीवर बंदी असल्याने हे मच्छीमार आपापल्या राज्यांमध्ये परतत असतात.

मढ मच्छीमार वि.का.स., मढ दर्यादिप संस्था, हरबादेवी मच्छीमार संस्था,  मालवणी मच्छीमार संस्था या सोसायट्यांचे मिळून 2300 मच्छीमार व खलाशी  ट्रेन्समधून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश  या राज्यांकडे रवाना झाले. श्री. अस्लम शेख यांनी या मच्छीमारांना रेल्वेस्थानकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 45 पेक्षा जास्त बेस्ट बसेसची व्यवस्थादेखील केली.