नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया उद्यापासून राज्यात सुरू होते आहे. उद्यापासून राज्य भरातल्या नागरिकांना व्यायाम करण्यासाठी, प्रभात फेरीसाठी, सायकल चालविण्यासाठी, धावण्यासाठी घराबाहेर निघता येईल.

सकाळी ५ ते संध्याकाळी ७ दरम्यान या गोष्टी करता येतील. सोसायटीतल्या मोकळ्या जागा, बगीचे, खुली मैदानं याठिकाणी नागरिकांना जाता येईल. मात्र बंदिस्त ठिकाणं किंवा बंदिस्त मैदानात हे व्यायाम करता येणार नाही. एकेकट्याने या सर्व गोष्टी करायच्या असून समुहाने फिरण्याला वगैरे बंदी कायम राहील. लहान मुलांना खेळायलाही बाहेर जाता येईल. मात्र मोठ्या माणसांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे.

याशिवाय प्लंबर, इलेक्ट्रिशियन, निर्जंतुकीकरण करणारे आणि इतर तंत्रज्ञांनाही सेवा सुरू करता येतील. वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेजही सुरू होणार आहे तरी त्यासाठी आधी अपॉइंटमेंट घेऊन जावे लागेल. सर्व सरकारी कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांनाही उपस्थित राहता येईल.