गणेशोत्सवासाठी 27 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी

मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी जातानाचे व येतानाचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांनादेखील होणार आहे.

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा  बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण दि.27 जुलै (26 जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाता-येताना चे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. (यापूर्वी ती 30 दिवस होती) साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. दि.27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षणसुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

हे  तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये  करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलै रोजी संध्याकाळी 4:00 ते मध्यरात्री 00:30 पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे ही प्रक्रिया करता येणार नाही. 26  तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. तरी या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले  आहे.