मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. २९ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  २११ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २४३ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ५ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६५ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २९० आरोपींना अटक.

■  ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील भिगवण पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागातील गुन्ह्यांची संख्या ५० वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात आपल्या व्हाट्सअपद्वारे कोरोना महामारीबद्दल व त्यावरील उपचारांबद्दल चुकीची माहिती   असणारा मजकूर विविध व्हाट्सअप ग्रुप्सवर प्रसारित केला होता. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन  परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअपवर तसेच अन्य सोशल मीडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे व अन्य माहिती प्रसारित होत आहे. अशा आशयाच्या  काही पोस्ट्स मोबाईलवर आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये. रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा, जर कोणी अशी माहिती पाठवत असेल आणि  तुम्ही व्हाट्सअप ऍडमिन किंवा निर्माते (group creator) असाल  तर तात्काळ सदर ग्रुप सदस्याची त्या ग्रुपवरून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग ‘only admin’ (ओन्ली ऍडमिन) असे करावे. कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे तसे मेसेज, व्हिडिओ किंवा पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित व्हाट्सअप ग्रुपच्या ऍडमिन्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.