मुंबई : राज्यातील  52 हजार 434 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 56 लाख 66 हजार 376 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच APL शेतकरी लाभार्थी अशा  रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 52 लाख 32 हजार 448  लाभार्थ्यांना 20 लाख 72 हजार 104 क्विंटल गहू, 15 लाख 96 हजार 798 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो अन्न-धान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून  जुलै महिन्यासाठी आतापर्यंत  19 लाख 97 हजार 474 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले.

स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 3 लाख 71 हजार 482 शिधापत्रिका धारकांमार्फत  ते जेथे राहत आहे त्याठिकाणी पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत अन्नधान्याची उचल केली  आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येते. या योजनमधून दि. 6 जून पासून जून महिन्यासाठी  आतापर्यंत 32 लाख 435 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. कोविड-19 संकटावरील  उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना  प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल मे व जून महिन्यासाठी वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो तूर किंवा चणा डाळ मोफत देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 89 हजार 792 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जातो. आतापर्यंत या योजनेतून 1 लाख 35 हजार 308 क्विंटल तांदूळ मे व जून महिन्यासाठी वितरित केला आहे.