नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ सर्वांना समान संधी देणारं असून त्यात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणांसंबंधीच्या संमेलना’चं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना बोलत होते.

या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक दर्जा शिक्षण दिलं जाणार असून, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिलं जाणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल, असं ते म्हणाले.

हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून, यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी केली असून, सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे, असं ते म्हणाले. आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त असल्यानं त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.