नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल सुमारे ५९ हजार कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं आज सकाळी दिली. बरे झालेल्यांची  आतापर्यंतची एकूण संख्या २० लाख ९६ हजार ६६४ झाली आहे. देशातलं कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.

देशभरात काल सुमारे ६९ हजार  नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २८ लाख ३६ हजार ९२६ इतकी झाली आहे. सध्या ६ लाख ८६  हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात काल ९७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबळींची एकूण संख्या ५३ हजार ८६६ झाली आहे. मात्र, देशातला मृत्यूदर सातत्यानं कमी होत असून सध्या तो १ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका खाली आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.