50 हून अधिक कंपन्या, 3 हजार हून अधिक सीएक्सओ स्तरीय प्रतिनिधी आणि 15 हजार अभ्यागत 8 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या व्हर्च्युअल कार्यक्रमात एकत्र येणार

नवी दिल्‍ली : केंद्रीय दूरसंचार, शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज एका व्हिडिओ मेसेजद्वारे इंडिया मोबाइल कॉंग्रेस (आयएमसी) 2020 ची चौथी आवृत्ती जाहीर केली. आयएमसी 2020, 8 ते 10 डिसेंबर रोजी होणार आहे आणि सध्याच्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन आभासी स्वरूपात करण्यात आले आहे.

दूरसंचार विभाग (डीओटी) आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओटी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये 50 हून अधिक देश, 110 हून अधिक जागतिक स्तरावरील वक्ते, स्टार्ट-अप्स, 15 हजार हून अधिक अभ्यागत यात सहभागी होणार आहेत. तीन  दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

यावर्षी आयएमसीची संकल्पना – “इन्कलुसिव्ह इनोव्हेशन – स्मार्ट आय सेक्युर आय सस्टेनेबल आय” ही आहे. आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय प्रादेशिक सहकार्य,समग्र भारत – सक्षम भारत याला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टांना पाठींबा म्हणून ही संकल्पना ठेवण्यात आली आहे.

यावर्षी प्रमुख भागीदारांमध्ये डेल टेक्नॉलॉजीज, रिबन कम्युनिकेशन्स आणि रेड हॅटचा समावेश आहे. यावर्षी भारतातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रमात जगातील काही प्रमुख उद्योग मान्यवर, नियामक आणि धोरणकर्ते एकत्र येत आहे. यात विविध मंत्रालये, टेल्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल सीईओ आणि एसजी ब्रॉडकास्टिंगमधील तज्ज्ञ, एसजी एंटरप्राइझ सोल्यूशन्स, ओटीटी यांचा समावेश आहे.

आयएमसीने स्वत: ला उद्योग, सरकार, शैक्षणिक संस्था आणि इतर घटकांना एकत्रित आणण्यासाठी एक अग्रणी व्यासपीठ म्हणून सिद्ध केले आहे. एसजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा एनालिटिक्स, क्लाऊड अँड एज कॉम्प्यूटिंग, ओपन सोर्स टेक, डेटा प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी, स्मार्ट सिटीज आणि ऑटोमेशन यासारख्या नवीन उद्योग तंत्रज्ञानाच्या ट्रेंडवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ आहे.

दूरसंचार क्षेत्रातील सर्व भागधारकांना एकत्रित आणणारे आयएमसी 2020 तंत्रज्ञान विषयक उवक्रमांसंदर्भातील एक प्रमुख प्रदर्शन असून ते धोरणकर्ते, नियामक आणि उद्योगासंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर महत्वपूर्ण चर्चेसाठी योग्य मंच उपलब्ध करून देईल असे मत केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केले.

इंडिया मोबाइल कॉंग्रेस हे असेच एक व्यासपीठ आहे, जिथे भारत सरकार आणि टेलिकॉम इंडस्ट्रीच्या प्रयत्नांनी केवळ आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक उत्तम प्रदर्शन उपलब्ध झाले आहे असे धोत्रे यांनी नमूद केले. अंशु प्रकाश, अध्यक्ष, डीसीसी आणि सचिव (टी), दूरसंचार विभाग, भारत सरकार, दूरसंचार मंत्रालय, अनिता प्रवीण, अतिरिक्त सचिव, दूरसंचार मंत्रालय, भारत सरकार आणि अजय पुरी, अध्यक्ष सीओएटी, सीओओ भारती एअरटेल या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.