नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी आले असता बातमीदारांशी बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी हित पाहणारे एकमेव प्रधानमंत्री आहेत, त्यांना थेट निवडणुकीत पराभूत करू न शकणारे, शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे ते म्हणाले.

कोणत्याही प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द होणार नाहीत, देशातला शेतकरी मोदी यांच्याबरोबर आहे, ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे त्यांच्याशी केंद्रीय कृषी मंत्री चर्चा करीत आहेत, ४ जानेवारीला होणाऱ्या चर्चेत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.