मुंबई (वृत्तसंस्था) : वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरूवात करत असल्याचं, नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.

पुण्याहून दिल्ली आणि चेन्नईला लस घेऊन जाणाऱ्या विमानांपासून या अभियानाची सुरवात झाली. तत्पूर्वी, सिरम कंपनीतून लशींचे डोस असलेले ६ ट्रक आज सकाळी कडक बंदोबस्तात पुणे विमानतळाकडं रवाना झाले.

एअर इंडिया, स्पाइस जेट, गो एअर आणि इंडिगो कंपन्यांच्या विमानांमधून ५६ लाख ५० हजार लसीच्या मात्रा दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलॉंग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, बेंगळूरू, लखनौ आणि चंडीगढ इथं पाठवल्या जात आहेत.