पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागला. शेकडो घरे जमीनदोस्त झाली. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. असंख्य जनावरे मृत पावली. कित्येकांना प्राणास मुकावे लागले. शेकडोंचे संसार उध्वस्त झाले. पुरग्रस्तांसाठी शासनाची मदत अपुरी/तोकडी पडत होती. अशा स्थितीत हातावर हात ठेवून नुसते पहात बसणे आम्हाला तरी शक्यच नव्हते. त्यामुळे संस्थेतर्फे मदतीसाठी नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले.

सातारा मित्र मंडळ , सातारा महिला मंडळ सांगवी, जुनी सांगवी व पिंपळे गुरव पुणे आणि जागृत नागरिक महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात मदत फेरी काढण्यात आली. जवळपास 15 दिवस संस्थेचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाश पाटील यांनी त्यांची बोलेरो गाडी डिझेल भरून मदत गोळा करण्यासाठी उपलब्ध करून दिली. सदस्य मा.सतीश जाधव यांनी या गाडीचे स्टेअरिंग सतत 15 दिवस हाती ठेवले होते.

अनेक प्रकारची मदत गोळा झाली. यामध्ये तांदुळ 455 किलो, गहू 200 किलो, गव्हाचा आटा 200 किलो, साखर 50 किलो, चहा पावडर 10 किलो, तूरडाळ 35 किलो, ज्वारी 20 किलो, बिस्कीट पुडे 145 नग, टूथपेस्ट 130 नग, कुरकुरे 90 नग, गोडेतेल 130 पाकीट, खोबरेतेल 127 बाटल्या, आंघोळीचा साबण 130 नग, कपड्यांचा साबण 125 नग, श्याम्पू 125 पाऊच, मीठ 1 किलोचे 125 पुडे, फरसाण 30 किलो, कांदा लसूण मसाला 125 पाकीट, पाणी बॉटल्स 1 लिटरच्या 90 व 1/2 लिटरच्या 160 , पेन किलर गोळ्या 100 नग, ओडोमॉस 125 नग, सर्दी पडसे गोळ्या 100 नग, ओव्यारिस 100 पाकीट, ओडोमास 127 नग, सॅनिटरी न्यापकीन 125 नग, नवीन साड्या 130, जुन्या साड्या 200, टी शर्टस 90 , जीन पॅन्ट 85, हगीस न्यापकीन 125 नग, लहान मुलांचे कपडे 300 नग, मोठ्यांचे पॅन्ट/शर्ट 300 नग, मुलींचे टॉप्स 102 नग, धोतर 50 नग, टॉवेल मोठे 105 नग, न्यापकीन 125 नग,डस्टर 130, चटया 20 नग, सतरंजी 22 नग, ब्लँकेट 130 नग, चादरी 52 नग, भांडी 9 पोती, तसेच लहान मुलांची खेळणी व साफसफाई करीता जुने कपडे 5 पोती इत्यादी वस्तूंचा समावेश होता. याशिवाय रोख रक्कम रुपये 20 हजार जमा झाले.

श्री. महेश आनंदा लोंढे संस्थापक/अध्यक्ष समता समाज सेवा प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ५ कुटुंबासाठी महिन्याभर लागणाऱ्या जीवन आवश्यक वस्तू देण्यात आल्या.

सर्व कपडे वेगवेगळे करून त्यांचे गठ्ठे बनवणे व पोत्यात भरणे, गहू /आटा, तांदूळ,साखर,एकत्र पोत्यामध्ये भरणे यासाठी सौ व श्री प्रकाश पाटील, सौ व श्री सतीश जाधव, सौ व श्री संभाजी मोरे सर, उमेश सणस, शिवाय सौ सुनीता साळुंखे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. नितीन यादव, नरेंद्र वाडते, राजेंद्र कदम, विशाल सकपाळ, ज्योतिराम कोकिटकर, सुनील नलवडे, सौ व श्री विशाल वीरकर, सौ वाडते, सौ व श्री सकुंडे, श्रीमती बाविस्कर, सतीश पाटील, हरिश्चंद्र साळुंखे, राजेश्वर थोरात, अशोक कोकणे, राजेश्वर विश्वकर्मा विजय यादव यांनी मदतीत सहभाग घेतला.

जवळपास 125 किट बनवण्यात आले.ज्यामध्ये 5 किलो आटा,5 किलो तांदूळ, साखर, चहा, खोबरेतेल, गोडेतेल, अंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण, मसाला, मीठ, बिस्किटे, टूथपेस्ट, फरसाण, साड्या, टॉवेल, ब्लँकेट, हगीज न्यापकीन, पाणी बॉटल, सॅनिटरी न्यापकीन, डस्टर, मेडिकल किट, इत्यादी वस्तूंचा 125 किटमध्ये समावेश होता.

तत्पूर्वी अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती शाखा पलूस जिल्हा सांगलीचे मुख्य समन्वयक श्री सुहास वड्डीकर यांनी सांगलीच्या पलूस भागातील पूरग्रस्त भागाचा मोटार सायकलवरून सर्व्हे केला. जे खरेच अतिशय गरजु आहेत, ज्यांची घरे पडली आहेत व संसार वाहून गेले आहेत, अशांचा प्रत्यक्ष शोध घेण्यात आला. त्यांची यादी बनवली. यातून सांगली जिल्ह्यातील नवी पुनदी, (इंगळेवस्ती), नगराळे, बुर्ली (मिठारेवस्ती), आमनापूर (घोलभाग), संतगाव (राडेवाडी), भिलवडी, हरीपुर  या गावातील 135 बाधित कुटुंबाना मदत देण्याचे निश्चित केले. बाधितांचे नाव, घरातील एकूण व्यक्ती, पुरुष/स्त्रिया, लहान/मोठी मुले, कमावती किती? वार्षिक उत्पन्न अंदाजे? असा संपूर्ण डाटा तयार केला. या प्रत्येकाला मदत किटबाबत पूर्व कल्पना दिली.

शुक्रवार दि.16/8/2019 रोजी रात्री 9 वाजता 36 सीटच्या बसमध्ये सर्व किटस भांड्यांची व कपड्यांची पोती आणि इतरही सामान भरण्यात आले. प्रकाश पाटील, संभाजी मोरे सर, सतीश जाधव, नितीन यादव, उमेश सणस, जयवंत निकम, त्र्यम्बक देशमुख, पांडुरंग पवार, सुनील नलावडे, साळुंखे व दोन ड्रायव्हर एक क्लीनर असे 12-13 जण प्रत्यक्ष वाटपासाठी सांगलीला रवाना झाले.

पूर्व नियोजनानुसार सर्व प्रथम किर्लोस्करवाडी येथील रामानंदनगर(शाखा पलूस) येथे सुहास वड्डीकर यांच्या घरी सर्व कपड्यांची/भांड्यांची पोती उतरवण्यात आली. त्यानंतर नाष्टा करून वड्डीकरांनी अगोदरच तयार ठेवलेल्या दोन ओमनी गाड्या व एक वेग्णार मध्ये 10-10 किट भरून पुरग्रस्तांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप केले. याबाबत पुरग्रस्तानचा डाटा गोळा करणे, फोटो घेणे, पुरग्रस्तांच्या सह्या घेणे इ. काम वड्डीकरांच्या सोबत असणारे निवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघ रामानंद नगर श्री पी.के.माने सर व नागराळेचे एन.जे.पाटील सर, पुनदीचे इंगळे सर शिवाय खंडू शेटे व डॉ दीपक चौगुले यांनी मोलाची मदत केली. अशा पद्धतीने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व 135 कुटुंबाना मदतकिट वाटप पूर्ण करून सर्व जण परतीच्या प्रवासाला निघाले.

मागील 15 दिवस अहोरात्र मेहनत घेवुन, किट बनवून पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांना केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.

“पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा” हा उपक्रम सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघासाठी एक समाधान देणारा उपक्रम होता. यामध्ये सहभागी सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य व सढळ हाताने मदत करणारे सर्व दानशूर नागरिक यांचे संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.