मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे.

आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. पोलिस आयुक्त, महापालिका प्रशासक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जिल्ह्यात वाढलेली  रुग्णसंख्या, उपचाराची स्थिती लक्षात घेऊन टाळेबंदी करायची किंवा नाही, या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, उद्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू होण्याची चुकीची माहिती काही प्रसारमाध्यमांवरून पसरल्यामुळे शहरातल्या बाजारपेठेत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काल दुपारनंतर मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.