नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंत्रालयांतर्गत, येणाऱ्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया उपस्थित होते.

डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या कामाचे कौतुक केले.

2005 मध्ये एचआयव्ही/एड्समुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण खूप होते. त्या तुलनेत ते 71 टक्क्यांनी कमी झाले असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. वर्ष 2030 पर्यंत एचआयव्ही/एड्सचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या सामंजस्य कराराचा फायदा वंचित गटापर्यंत जागृती आणि साहाय्य पोहोचवण्यासाठी होईल, असे राज्यमंत्री कटारिया यांनी सांगितले.