मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी, आणि येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सातारा जिल्ह्यातल्या लाभक्षेत्रातल्या जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

ते काल कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत बोलत होते. प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचं काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, इत्यादी उपस्थित होते.

विशेष बाब म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘आयटीआय’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरण’मध्ये प्राधान्यानं नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्त आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातल्या बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबवाव्यात, या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.