मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत कडकडीत विकेंड लॉकडाऊन सुरू असून शहर आणि उपनगरातील बाजारपेठा, रेल्वे स्थानकं, उद्यानं आणि रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरू आहे. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे.

सिनेमागृहं आणि नाट्यगृहं बंद असून टेल आणि रेस्टॉरंट मधून होम डिलिव्हरी सुरु आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा विकेंड लॉकडाऊन सुरू राहणार आहे.

रायगड जिल्हय़ात आज लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंद केलं असून समुद्र किनाऱ्यानवरही शुकशुकाट आहे.

राज्य सरकारच्या ब्रेक द चैन आवाहनाला सिंधुदुर्गवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. मात्र, सरकारन व्यापाऱ्यांना यातुन सूट द्यावी अशी मागणी व्यपाऱ्यानी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण बाहेर पडणारे, तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

महाराष्ट्र – गोवाच्या दोडामार्ग आणि पत्रादेवी सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात संचार बंदीला चांगला प्रतिसाद मिळाला रस्त्यावर सकाळपासूनच वाहनाची वर्दळ कमी होती.सर्व दुकाने बंद असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.

बुलडाण्यात नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.बुलडाणा शहरात आज सकाळी ७ वाजल्यापासून जिल्हयातील खामगाव, शेगाव, संग्रामपूरसह सर्व शहरामध्ये दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्याचा या बंद ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद आहेत.धुळे शहरात विकेंड लॉकडाऊनमूळे आज सर्वच बंद आहे, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शहरात पाहणी करून आढावा घेत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना समज दिली.