नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.

प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या प्रवाशांनाच महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर उतरता येईल, असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. या सहा राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करावी, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक काळजी घ्यावी, अशा सूचना त्यात दिल्या आहेत. तसंच, चाचणी निगेटिव्ह असली तरी या प्रवाशांना १५ दिवसांचं गृह विलगीकरण बंधनकारक आहे. तसे शिक्के प्रवाशांच्या हातावर मारण्याच्या सूचना या आदेशात  दिल्या आहेत.