मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.

राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी पेटीएम फाऊंडेशन राज्य शासनाला सहकार्य करणार आहे. त्याअनुषंगानं दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

कोरोनापासून धडा घेऊन येणाऱ्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे.

पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधां जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढवणाऱ्यावर भर आहे.

आता जुलैनंतर पावसाळ्यामुळे साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढवायचं नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहेत.

त्यामध्ये तात्पुरतं आणि दीर्घकालीन असं नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत, असं ते म्हणाले.

पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढं आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी त्यांची प्रशंसा केली. अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असं ते म्हणाले.

कोविड उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सातत्यानं करत असलेले प्रय़त्न आणि पुढाकाराचं पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर-शर्मा यांनी कौतूक केलं. ठाकरे यांच्या दूरदृष्टीकोनातून सुरु असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचं ते म्हणाले.