मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सुमारे २० हजारानं जास्त आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. मृत्यू दरात मात्र किंचित वाढ दिसून येत आहे.

काल ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, २२ हजार १२२  नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ३६१ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आजपर्यंत तपासलेल्या ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २ हजार १९, म्हणजे १६ पूर्णांक ८३ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. त्यापैकी आतापर्यंत ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले. तर एकूण ८९ हजार २१२ रुग्ण दगावले.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. सध्या राज्यात ३ लाख २७ हजार ५८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ५९ टक्क्यावर पोचला आहे.

धुळे जिल्ह्यात काल १०५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं. काल ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्हाभरात १ हजार २७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

जालना जिल्ह्यात काल दिवसभरात २४० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल २३६ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्हाभरात ३ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल ७१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात काल ५२ नव्या बाधितांची नोंद जाली, तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ४९६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यातले १२६ रुग्ण काल कोरोनामुक्त होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल एकाच दिवसात ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२ बाधितांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ३ हजार ६७९ कोरोनाबाधितांवर उपाचर सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यात काल २१० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या जिल्हाभरात १ हजार ६२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल कोरोनामुक्त झालेल्या ५७८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. काल जिल्ह्यात २४१ नव्या बाधितांची नोंद झाली, तर ५ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्हाभरात ३ हजार १५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.