नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश काल राज्य सरकारनं जारी केले. कोरोना संसर्गाचं प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं संपर्कमंत्र्यांच्या सल्ल्यानं स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचं नियोजन करावं असं या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित सामाजिक अंतराचे नियम पाळून साजरा होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहील. समारंभात सर्वांसाठी मुखपट्टी बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी संकेतस्थळावर अथवा समूह माध्यमांवर त्याचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं असंही सांगण्यात आलं आहे.