मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत, एक कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट असून, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.

हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली. यासाठी लागणारं पुरेसं मनुष्यबळ तात्पुरत्या स्वरूपात उपल्ब्ध करून द्यावं, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राज्यात आतापर्यंत नळजोडण्यांचं ६५ टक्के उद्दीष्ट पूर्ण झालं असून, शाळांमध्ये ८६ टक्के तर अंगणवाड्यांमध्ये ७७ टक्के नळ जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं असल्याची माहिती, या बैठकीत देण्यात आली.