नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात भारतानं वेगानं पावलं उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या कोरोना विरोधातल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. भारतानं अशी रीतीनं लढा दिल्यामुळेच कोरोनामुळे झालेल्या नुकसानीतून भारताला वेगानं उभारी घेण्याची संधी असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. या महामारीच्या काळात भारतानं सर्वाधिक गरजुंना मदत देण्यासह, पतधोरणातली सुलभता, तरलतेसंदर्भातल्या तरतुदी, वित्तीय क्षेत्राची संर्वंकषता, नियमन धोरणं अशा उपाययोजना राबवत संरचनात्मक सुधारणा कायम ठेवल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळानं नुकतीच भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थितीच्या मूल्यांकनासाठी भारताच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. संसर्गाच्या कठीण काळातही भारतानं कामगार सुधारणा आणि खासगीकरणासारखी धोरणं राबवत संरचनात्मक सुधारणा करणं सुरुच ठेवल्याचं नाणेनिधीनं नमूद केलं आहे.