मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा घेण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ज्या योजनांमध्ये झोपडीधारकाचं भाडं थकित असून, पुनर्वसनाचं काम रखडलं आहे, अशा योजनांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत निविदा काढून नवीन विकासकांची नियुक्ती करणं.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत योजना पूर्ण करणं. शासकीय जमीन धारणीधारक ‘क मध्ये म्हणजेच वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करायला मुभा देणं, रखडलेल्या योजनांबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुक असलेल्या वित्तीय संस्थांकडून 45 दिवसांच्या कालावधीत अर्ज मागवणं, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या 8 हजार 334 एकर जमीनीवर हे प्रकल्प रखडले आहेत.